मोडी दस्तऐवज लिप्यंतरासाठी कसे पाठवावेत?

१. सर्वप्रथम आपल्या दस्तऐवजाची PDF तयार करायची आहे. त्यासाठी झेरॉक्स अथवा सायबर कॅफेवाल्यांकडे असतात तश्या स्कॅनर्सवर आपले दस्तऐवज 300dpi वर स्कॅन करुन घ्यावेत व सर्व फोटोंची मिळून एक PDF तयार करुन घ्यावी.

२. ही PDF, WhatsApp क्रमांक 9920028859 वर पाठवावी किंवा kanchankarai@gmail.com येथे इमेल करावी.

३. PDF पाठवताना आपला परिचय लिहावा. जसे: आपले नाव, फोन नंबर, पत्ता इ.

फोनवर संपर्क साधायचा असेल तर 9920028859 ह्या क्रमांकावर सकाळी ११ ते सायं. ६ ह्या वेळेमध्ये सोमवार ते गुरूवार ह्या दिवसांत फोन करुन सविस्तर माहिती द्यावी.

मोडी लिपीच्या नि:शुल्क प्रशिक्षणासाठी YouTube चॅनेल Subscribe करा. ModiScriptOnline

आमची नोंद गुगलवर: 4.9 Star Rating मोडी लिपी

आपले कागदपत्र पाठवायचे असल्यास कृपया येथे क्लिक करुन फॉर्मसोबत जोडावेत.

शिवछत्रपतींचे अप्रकाशित पत्र

दि. ९ जुलै २०१८ रोजी भारत इतिहास संशोधक मंडळ, पुणे येथे झालेल्या पाक्षिक सभेमध्ये इतिहास संशोधक श्री. घन:श्याम ढाणे यांनी धुळे येथील समर्थ वाग्देवता मंदिरामधील दफ्तरखान्यामधून स्वत: शोधलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अप्रकाशित पत्राचं वाचन केले. ह्या सभेला डॉ. रजनी इंदूलकर, मंडळाचे सचिव आणि इतिहास संशोधक श्री पांडूरंग बलकवडे, उपाध्यक्ष बि.डी. कुलकर्णी आणि विश्वस्त डॉ. सचीन जोशी यांच्यासह इतिहास संशोधक कै. निनाद बेडेकर यांच्या पत्नीदेखील उपस्थित होत्या. मंडळाच्या सदस्यांसोबतच इतिहास अभ्यासकांनीदेखील ह्या सभेला हजेरी लावली.

आजवर शिवछत्रपतींची २७३ पत्रे उपलब्ध आहेत, त्यापैकी १०३ पत्रे पाहता येतात आणि इतर पत्रांचे तर्जुमे (आशय-विषयानुसार लिहिलेला सारांश) उपलब्ध आहेत. त्या पत्रांच्या यादीव्यतिरिक्त सापडलेले असे हे अप्रकाशित पत्र आहे. शिवछत्रपतींची पत्रे खंड २ ह्या ग्रंथात पान क्र. ३३८ ते ३५० वर देवनागरी लिप्यंतरासह ज्या महजराची माहिती दिलेली आहे, त्या महजरामध्ये ज्या पक्षाच्या बाजूने निकाल लागला त्या पक्षाला महाराजांनी दिलेला कौलनामा म्हणजेच घन:श्याम ढाणेंनी उजेडात आणलेले हे पत्र!



पत्राची पार्श्वभूमी:
खंडोबाची पाली ह्या गावी खराडे पाटील आणि कालभार (काळभोर) पाटील यांच्यात पाटीलकीच्या अधिकारावरून वाद सुरू झाला म्हणून त्या वादातील दोन्ही बाजूंची सत्यासत्यता पडताळून पाहण्यासाठी महजर करण्यात आला. ह्या महजरासाठी प्रत्यक्ष शिवछत्रपती उपस्थित होते. दिव्य केल्यानंतर आलेल्या परिणामावरून गोताने जे अनुमान काढले त्यावर कालभार पाटीलांच्या पक्षात निर्णय देण्यात आला व खराटे पाटील ह्यांना चूक ठरवण्यात आले. महजराचा दस्तऐवज लिहून झाल्यानंतर कालभार पाटीलांना सदर पाटीलकीवर त्यांचाच हक्क आहे, असे स्पष्ट नमूद करणारे जे स्वतंत्र पत्र म्हणजेच कौलनामा किंवा अभयपत्र देण्यात आले, तेच हे पत्र!

पत्राचा तपशील:
ह्या पत्राची लांबी १ फूट ३ इंच असून रूंदी ६.५ इंच आहे. पत्राच्या सुरूवातीला मध्यावर शिवछत्रपतींची मुद्रा, दोन ओळींनंतर डावीकडे प्रधानांची मुद्रा आहे तर पत्राच्या अखेरीस समाप्तीमुद्रा देखील आहे. पत्रामधील दिनांक सुहूर सनानुसार लिहिलेला आहे. एकूण १७ ओळींच्या ह्या पत्राच्या पाठीमागच्या बाजुस मुसलमानी कालगणनेनुसार दिनांक नोंदवलेला आहे. श्री. ढाणे ह्यांनी प्रधानांच्या मुद्रेबद्दल स्पष्टीकरण देताना असे म्हटले कि "छत्रपतींचे प्रधान मोरोपंत पिंगळे ह्यांच्या मुद्रेत राज्याभिषेकानंतर काही बदल करण्यात आले होते. सदर पत्रातील मुद्रा ही राज्याभिषेकापूर्वीची आहे". ह्या पत्राचा दिनांक आंग्ल कालगणनेनुसार २ फेब्रुवारी १६७४ असा आहे. म्हणजे राज्याभिषेकाच्या सुमारे ५ महिने पूर्वीचं हे पत्र आहे. महाराजांच्या राज्याभिषेकापूर्वी सर्व पत्रांचे मायने अरबी असत. मात्र राज्याभिषेकानंतर शिवछत्रपतींनी राज्यकारभाराला शिस्त आणण्याच्या दृष्टीने पत्रांच्या भाषेतही बदल करून त्यात अधिकाधिक मराठी शब्दांचा भरणा असेल अशी व्यवस्था केली होती. ही बाब राज्याभिषेकापूर्वीची व नंतरची पत्र पाहताना मायन्यांच्या संदर्भात प्रकर्षाने लक्षात येते. ह्या पत्राद्वारे प्रत्यक्ष शिवछत्रपतींनी कालभार पाटील यांना कौलनामा दिला असला तरीही दिव्याच्या प्रसंगी महाराजांनी निर्णयाचे सर्व अधिकार हुकुमशहाप्रमाणे फक्त स्वत:कडेच न ठेवता, गोतास दिले आहेत. गोताने एकमुखाने जे अनुमान काढले त्याच्या आधारावर निर्णय दिला गेला आहे.

प्रत्यक्ष पत्राचे वाचन करण्यापूर्वी हे पत्र शोधण्याचा रंजक प्रवास श्री ढाणे यांनी अतिशय सुरस शब्दांत कथन केला. पत्राची पार्श्वभूमी, त्याचे महत्व अश्या अनेक बाबी ज्या त्यांना सर्वप्रथम पत्र वाचताना लक्षात आल्या त्या त्यांनी उपस्थितांसमोर विशद केल्या. पत्राच्या संदर्भातील स्पष्टीकरणार्थ मांडलेले मुद्दे आणि वस्तूस्थिती यावरून त्यांच्या संशोधनामधील सखोलता लक्षात येते. "एक पत्र शोधण्यासाठी २०-२५ वर्षे लागली तरी आपण त्याचा पाठपुरावा केला पाहिजे" ह्या त्यांच्या शब्दांमधून ते किती संयमी तरीही जिद्दी आहेत हे कळते.

**************
टिपा:
महजर म्हणजे काय?
अनेक व्यक्तींना साक्ष ठेवून केलेला न्यायनिवाडा, ज्याचा तपशीलवार दस्तऐवज तयार केला जातो, त्याला महजर असे म्हणतात. महजर हा अरबी शब्द आहे. त्याला निवाडापत्र असं मराठीत म्हणता येईल. महजरामध्ये निवाड्यासाठी उपस्थित व्यक्तींची नावे त्यांच्या अधिकाराच्या अनुक्रमानुसार लिहिण्यापासून ते महजर करण्याचे कारण, प्रक्रिया, निर्णय इ. सर्व वर्णन तपशीलवार लिहिले जाते.

दिव्य म्हणजे काय?
दिव्य म्हणजे शब्दश: अर्थ ’कठीण परिक्षा’ असा होतो. (अग्निदिव्य हा शब्द आपल्या अनेकदा वाचनात आला आहे). आपला खरेखोटेपणा सिद्ध करण्यासाठी सबळ पुरावा नसेल तर आपली बाजू न्याय्य आहे हे पटवून देण्यासाठी दिव्य करावे लागत असे. रवा दिव्य, ऐरण दिव्य, धार दिव्य अशी निरनिराळ्या प्रकारची दिव्ये असत. ह्यापैकी संबंधित महजरामध्ये दोन्ही पक्षांना रवा दिव्य करण्याची आज्ञा दिली गेली होती. रवा दिव्य म्हणजे तेला-तुपाच्या गरम मिश्रणात धातूचा लहानसा तुकडा सोडला जायचा आणि तो दिव्य करणाऱ्या व्यक्तीस बोटांनी उचलून बाहेर काढावा लागायचा. बोटाला फोड आला तर ती व्यक्ती खोटं बोलत आहे असे समजले जायचे. (प्रस्तुत महजरामध्ये एका विशिष्ट पायरीनंतर फक्त एकाच पक्षाला दिव्य करावे लागले होते).